What do I want ? What can I have ? What will I be willing to fight for ? Will it make me happy ? -Avinash Tilak
TwitterLiked the quote? Tweet it!
see all quotes

पानशेत चा पूर - सौ. प्रतिभा नेने


Note: To be able to read this Marathi text, please ensure you have set View->Character Encoding to Unicode (UTF-8) in your browser.

दि. १६ एप्रिल २०१५

श्री गणेशाय नम: ।
ॐ नम: शिवाय ।
श्र्री सद्गुरवे नम:

की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने
जे दिव्यदाहक म्हणोनि असावयाचे
बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ह्या पंक्ती आज विशेषत्वाने स्मरण्याचे कारण म्हणजे माझे वडील कै. श्री नामदेव आत्मारम गोखले यांचे जन्मशताब्दि वर्ष आज सुरू होत आहे.

कोकणातल्या आडगावातला एक पोरसवदा तरुण पुण्यांत नशीब काढायला येतो, व शून्यातून सृष्टी निर्माण करतो. त्यांचे सर्व आयुष्यच प्रेरणा देणार आहे, पण त्यांच्या आयुष्यातील एक ठळक घटना स्मरून त्यांना श्रद्धांजली वहात आहे.

आमचे कुटुंब नदीकाठी शनिवार पेठेतील श्री सिद्धेश्वर - श्री अमृतेश्वर मंदिरातील विद्यानिधी श्री सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचे वाड्यात रहात होते. माझे वडील, ज्यांना आम्ही 'काका' म्हणत असू, त्यांनी खूप कष्टाने लाॅन्ड्रीचा व्यवसाय सुरू केला होता. दक्षिण मुखी मारुतीजवळ आमचे दुकान होते. व राहत्या वाड्यामध्ये लाॅन्ड्रीची मशिनरी होती. दोन कपडे धुण्याची मशीनस्, एक कपडे पिळण्याचे मशीन, मोठा बॅायलर, एक ड्रायक्लीनिन्गचे मशीन, व प्रत्येक मशीनला स्वतंत्र मोटर असा पसारा होता. आम्ही भावंडे शाळेत शिकत होतो.

असे सर्व सुरळीत चालू असतांना १९६१ साली पुण्याला पाणी पुरवणारे पानशेत धरण आजारी पडल्याच्या बातम्या पेपर मध्ये येऊ लागल्या. मातीचे धरण व त्याच्या भिंतींना तडे जाऊ लागले होते. धरण फुटले तर नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका होता. म्हणून पुणेकर काळजीत पडले होते. सरकार कडून तिथे सिमेंटची पोती वगैरे टाकून दुरुस्तीचे प्रयत्न चालू होते. पण सरकारचे प्रयत्न फसले व १२ जुलै रोजी शेवटी धरण फुटले. १२ तारखेला सकाळी ८ वाजता पोलिसांनी धरण फुटल्याची बातमी दिली व घरे सोडून दुसरीकडे आश्रयाला जायची सूचना दिली. ही वार्ता ऐकून सर्वांचे अवसानच गळाले. पण माझे वडील फार धीराचे होते. त्यामुळे त्यांनी आम्ही भावंडे व आमची आई यांना पुणे स्टेशन जवळ आमचे नातेवाईक होते तेथे हलवले. व ते पुन्हा वाड्यांत परत आले.

आता काकांना व्यवसायाची चिंता होती. प्रत्येक मशीनची मोटर व मशीनरी वाचवणे हा प्रश्न होता. मशीनरी मजबूत पायामध्ये बसवलेली होती. पण मोटर्स वाचवणे आवश्यक होते. आमच्याकडे इतर लाॅन्ड्रींमधून कपड्याची ने - आण करणारा गडी होता. त्याच्याबरोबर काकांनी मोटर्स दुकानांत पाठवून दिल्या. नंतर वाड्यातील सर्व जणांना बाहेर पडण्याचे अवाहन ते करू लागले. वाड्यातील सर्व बिऱ्हाडकरूंनी बायका मुले सुरक्षित ठिकाणी पाठविल्या होत्या. व सर्व पुरुष थांबले होते. माझा आतेभाऊ - जो आमच्यकडे असे - तोही होता. मोत्या, आमचा कुत्रा ही तिथे होता. पुराची बातमी ऐकून काकांचे ३ - ४ मित्र येऊन पोहोचले होते. शिवाय आमचे गडी होते, वाड्याचे मालक, त्यांचा मुलगा, त्यांचे बांधकामाचे गडी अशी २० - २१ माणसे होती. सर्वजण बाहेर पडण्याच्या तयारीत होते, पण चित्रावशास्त्री बाहेर जाण्यास तयार होईनात.

पोलीसांनी पाणी ११ वाजेपर्यंत शहरात पोहोचेल असे सांगितले होते. सर्वजण शास्त्रींना विनंती करत होते. पण ते नकार देत होते. या सर्व खटाटोपात पाणी वाड्यात कधी शिरले ते कळले नाही. १ लाट आली की पाणी ६ फूट चढत होते. पाणी अल्याबरोबर शास्त्रीबुआ बाहेर पडण्यास तयार झाले पण तोपर्यंत वाड्याबहेर पडण्याचा मार्ग बंद झाला होता. आता 'जीव' कसा वाचवायचा याचा सर्वजण विचार करू लागले.

सिद्धेश्वराचे मंदिर अगदी नदीकाठी आहे व अमृतेश्वराचे मंदिर आतल्या बाजूला आहे म्हणून सर्वांनी त्याचा आसरा घयायचा विचार केला. पाणी बघता बघता वाढत होते. देवळावर चढायचे कसे ? असा प्रश्न होता. देवळासमोर नंदीचे जे देऊळ आहे, त्यावर आधी चढावे असे ठरले. त्यावर चढण्यासाठी वाड्यात बांधकाम चालू होते त्याच्या शिगा त्या लोकांनी पाण्यांत बुडी मारून शोधून काढल्या. व शिगांच्या आधारे प्रथम नंदीच्या देवळावर व तेथून अमृतेश्वराच्या गच्चीमध्ये पोहोचले. त्यांतील काहीजण भित्रे होते व शास्त्रीबुआ वृद्ध असल्याने इतरांनी त्या सर्वांना आधार देऊन चढविले. अशा रीतीने सर्व एकवीस जण सुखरूप गच्चीवर पोहोचले.

त्या दिवशी अर्धा तास ऊन व अर्धा तास पाऊस असे हवामान होते. त्यामुळे सर्वजणांना थंडीचा सामना करावा लागला. सभोवती पाण्याचा समुद्र उसळत होत. जिवाची काळजी व वातावरणाचा त्रास ह्यांत आपण निदान सुखरूप आहोत हीच दिलासा देणारी होष्ट होती. अशा परिस्थितीत सर्वजण पाणी उतरेल या आशेवर वाट पहात होते.

इकडे स्टेशनवर आम्ही सर्व हवालदिल झालो होतो व काकांची वाट पहात होतो. शेवटी आमच्या आईचा धीर खचला. व तिने आपण प्रत्यक्ष पाहून येऊ म्हणून माझया आतेभावाला घेऊन ती गेली. त्यावेळी कुठलेही वाहन उपलब्ध नसल्यामुळे दोघे चालत नव्या पुलापाशी आले. तिथे पुलाखाली पाणी टेकले होते. व लोक बघण्यासाठी गर्दी करत होते. आपला वाडा दिसावा म्हणून दोघे पुलाच्या मध्यावर गेले. तेथून काही कळत नव्हते. फक्त पाण्याचा समुद्र दिसत होता. त्यामुळे वडिलांचे नक्की काय झाले असेल, ह्या विचाराने तिचे अवसानच गळाले. तेवढ्यात पोलीस पुलावरून हाकलायला आले वे हे दोघे शनिवार वाड्याशी आले. तेवढ्यात पाणी पुलावरून वाहू लागले होते.

पाण्याची व्याप्ती वाढतच होती. हळूहळू पाणी अमृतेश्वराच्या गच्चीत शिरले. व पाहता पाहता गच्ची पाण्याने भरून गेली. एक एक लाट प्रलयासारखी वाटत होती. आता जीव वाचविण्यासाठी एकेक जण देवळाच्या शिखरावर गोपुरे आहेत त्यावर चढायला लागला. कसेबसे गोपुरांना धरून लोक जीव वाचवत होते.

हे सर्व घडत असतांना आमचा पूर्ण वाडा पाण्याखली गेलेला होता. व जुने मातीचे बांधकाम असल्यामुळे हळूहळू ढासळत जाऊन जमीनदोस्त झाला होता. व प्रत्येकाच्या घरातील वस्तु, लाकडी कपाटे, पलंग वगैरे पाण्यावर येऊन तरंगू लागले होते. आमच्या घरी वर्षभराचे धान्य साठवलेले होते. पत्र्याचे डबे मेणाने सील केलेले असत. ते सर्व डबेही पाण्यावर तरंगून वर आले. पाण्याचा प्रवाह सिद्धेश्वराच्या देवळाला वळसा घालून अमृतेश्वराच्या देवळाकडे येत होता. त्यामुळे वहात जाणारी प्रत्येक लहानमोठी वस्तु अमृतेश्वराला वळसा घलून पुढे शनिवार वाड्याकडे जायची. आधीच जिवाची भीति, त्यांतून थंडीने कुडकुडलेले, अशात आपला संसार डोळ्यासमोर वहात चाललेला या लोकांना पहावा लागला. त्यांतही मझे वडील धैर्यवान असल्यामुळे त्यांनी रॅाकेलचा डबा आपल्या जवळून वहात जाताना धरून गोपुरात अडकवून ठेवला होता. तो पुढे त्यांना उपयोगी पडला.

देवळाच्या गच्चीत पाणी भरायला लागल्यापासून येथून बाहेर कसे पडायचे याचा विचार काकांनी सुरू केला. व ज्यांना 'शक्य आहे' त्यांनी पोहून बाहेर पडावे असे सुचवले. पण शास्त्रीबुआ काही परवानगी देत नव्हते. आपण देवाच्या डोक्यावर आहोत, तो आपले रक्षण करील, असे त्यांचे म्हणणे होते. पण, प्रयत्न न करता केवळ देवावर हवाला ठेवून २१ जणांनी कळसावर थांबणे, हे काकांना पटत नव्हते. दुपारी ३:३० च्या सुमारास पाणी स्थिरावले असे वाटले. तेव्हा काकांनी माझा आतेभाऊ, आमचे ५/६ गडी, शास्त्रीबुआंचे बांधकामाचे गडी वगैरे सर्व लोकांना, तुम्हापैकी ज्यांना जायचे असेल त्यांनी पोहून बाहेर पडा असे सांगितले. शास्त्रीबुआंचा अजूनही विरोध होता, पण इतरांच्या म्रुत्यूचे पाप आपल्या माथी घेणे बरोबर नाही अशी काकांनी त्यांची समजूत घातली. शास्त्रीबुआ बाहेर पडायला भीत असल्यामुळे त्यांच्या मुलासह, व काही मित्रांसह, काकांनी थांबायचे ठरवले. पण माझा आतेभाऊ व आमचे गडी त्यांना सोडून जायला तयार होईनात. बांधकामावरची माणसे जायला तयार झाली. काकांनी दोन गड्यांची समजूत घातली की तुम्ही बाहेर जाऊन आम्ही सुखरूप आहोत एवढे तरी सांगू शकाल. सर्वचजण मेलो, तर कोणालाच काहीच कळणार नाही. हे ऐकल्यावर त्यातले दोघेजण जायला कसेबसे तयार झाले. आमचे दोन गडी व बांधकामवरचे तीन जण, असे पाचजण पोहून बाहेर पडले व आमच्या दुकानांत येऊन गड्यांनी बातमी दिली. आमचे बाकीचे काही गडी व दुकानातला स्टाफ असे सर्वजण दुकानात काळजी करत बसले होते.

इकडे पाणी रस्त्यांवर पसरू लागले तसतसे एकेक करून गल्लीतली घरे पाण्याखाली जाऊ लागली. आमचे दुकान दक्षिणमुखी मारुतीजवळ जमखिंडीकर बिल्डिंग मध्ये होते. पाणी जसे मारुतीच्या देवळाच्या पुढे यायला लागले, तसे, मशीनच्या ज्या मोटर्स दुकानात ठेवल्या होत्या, त्या, आमच्या दुकानातल्या मॅनेजरने समयसूचकतेने बिल्डिंगमधल्या वरच्या मजल्यावर नेऊन सुरक्षित ठेवल्या. नंतर पाणी इतके वाढले की प्रभात टॅाकीज पर्यंत गेले. आमच्या दुकानात पुरूषभर पाणी झाले होते.

इकडे दुपारी ३:३० च्या सुमारास पाणी स्थिरावले. व आता हळूहळू पाणी उतरायला लागेल अशी आमच्य लोकांना आशा वाटू लागली. पण अर्धा तास गेला नसेल तर् पुन्हा मोठमोठ्या लाटा येऊ लागल्या. सर्वांना आश्चर्य वाटले की हा काय प्रकार आहे. पण काकांच्या लक्षात आले, की याचा अर्थ खडकवासला धरणही फुटले असणार. व मग त्यांचे टेन्शन आणखीनच वाढले. आता मात्र, त्यांच्यामुळे माझा भाऊ व आमचे गडी पोहून जात नव्हते, याचे त्यांना फार टेन्शन वाटू लागले. कारण आता पाणी आणखी किती वर चढणार याचा अंदाज लागणे अशक्य होते. आधीच देवळाच्या वर गोपुरांच्या अर्ध्या उंचीवर माणसे बसली होती. आणखी पाणी वाढले तर जागाच मिळणार नव्हती. शेवटी काकांनी शास्त्रीबु आंची व इतरांची समजूत घातली की आता जीव वाचवण्यासाठी काहीतरी हालचाल करण्याशिवाय गत्यंतर नाही. तेव्हा, जे जे लोक येत आहेत, त्यांचेसह आम्ही इथून बाहेर पडतो, व तुम्हाला न्यायला खात्रीने परत येतो. त्या लोकांनीही काळाची गरज ओळखून परवानगी दिली.

अशा रीतीने ४:३० च्या सुमारास काका, भाऊ, व आमचे गडी, असे तिथून बाहेर निघाले. कुठून बाहेर पडायचे याविषयी विचार सुरू झाला. प्रथम, शनिवार वाड्याच्या बाजूला, प्रवाहाच्या दिशेने जावे असे वाटले. पण प्रत्येक येणारी प्रचंड लाट शनिवार वाड्याच्या भिंतींवर जाऊन आदळत होती. त्या लाटांबरोबर आदळून आपलाही कपाळमोक्ष होईल असे लक्षाता आल्याने, प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचे असे ठरले. म्हणून मागील बाजूने अहिल्यादेवी हायस्कूलकडे जायचे असे ठरले.

इतका वेळ सोबत असलेला मोत्या, आमचा कुत्रा, एव्हाना ऊन पावसामुळे बिथरून लोकांच्या अंगावर ओरडत होता. आधीच बरेचजण तिथे भित्रे होते, ते मोत्यामुळे आणखी घाबरत. पण काकांनी व भावानी त्याला कसेबसे आवरले होते. आता त्याला तिथे ठेऊन जाणे शक्य नव्हते. काकांनी सामानाबरोबर वाहत अलेले व देवळाला अडकून बसलेले एक टेबल उलटे केले व तराफ्यासारखे वापरून मोत्याला त्यावर बसवले. व आपल्याबरोबर घेऊन निघाले. पण लाटांच्या जोरामुळे जरा वेळाने टेबल प्रवाहाबरोबर वाहून गेले व ते मोत्याला वाचवू शकले नाहीत. त्याची त्यंना नंतर कितीतरी दिवस हळहळ वाटत राहिली. पण शेवट पर्यंत त्यांनी त्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला होता.

या सर्व गडबडीत, पाण्यातून मार्ग काढताना, पाण्याच्या जोरामुक्ळे काका इतरांपासून थोडे बाजूला जाऊ लागले. तसे आमचा एक गडी 'लक्षया' याच्या लक्षांत आल्याबरोबर त्याने ताकदीनिशी काकांना ओढून त्यांच्या जवळ आणले.

तेथीलच रहिवासी असल्यामुळे काकांना तो परिसर संपूर्ण माहित होता. पण सर्व घरे पाण्याखाली गेलेली व कुठे कुठे थोडा भाग दिसत होता. त्याचा अंदाज घेत हे सर्वजण अहिल्यादेवी शाळेच्या बाजूला निघाले. इमारतीचा जो भाग दिसत होता त्याचा पोहोताना आधार घयायचा असे ठरले. पण आधार म्हणून पाय ठेवायला जावे तर तो भाग पाण्यांत कोसळायचा. अशा तऱ्हेने जिवाची बाजी लावून मोठ्या धारिष्ट्याने पोहून हे लोक शनिवार पेठ पोलीस चौकीपर्यंत पोहोचले. रस्त्याने पाच मिनिटांचे अंतर नव्हते पण हे सर्व जण तिथे पोहोचायला अडीच तास लागले. पोलीसांना कळेना की ही माणसी एवढ्या पाण्यातून आलीच कशी.

सर्वजण रस्त्यावर पोहोचल्यावर प्रथम आमच्या दुकानात गेले व यांना सुखरूप बघून तिथे वाट बघत असलेल्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. त्यानंतर प्रत्येक जण आपापल्या घरी गेला. आमचे काका व भाऊ स्टेशन जवळच्या घरी आले तेव्हा त्यंना बघून आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यंना पोहोचेपर्यंत संध्याकाळचे ७ वाजले होते. त्यांनी अंघोळ करून जेवून विश्रांती घेण्याचे गरज होती. पण आपली जिव्हाळ्याची माणसे तिकडे अडकलेली आहेत व आपण त्यांना शब्द दिला आहे, म्हणून ते दोघे जेमतेम चहा पिऊन, अंघोळ उरकून बाहेर पडले. २ मोठ्या बॅटऱ्या घेऊन ते पुन्हा शनिवार वाड्यापाशी आले. कळसावर जी उरलेली माणसे होती त्यांना सुखरूप खाली आणायचे होते ना!

एव्हाना पाणी खूपच ओसरले होते व ठिकठिकाणी पोलीसांनी चौक्या बसवल्या होत्या. कारण लोकांचे सर्वस्व गेले होते. व काही सामान मिळेल या आशेने लोक आपल्या घरांकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. पण तिकडे गुडघयापेक्षाही जास्त उंचीचा चिखल माजला होता. पानशेत हे मातीचे धरण असल्यामुळे तेथील चिकण माती वाहून आली होती. व अंधार पडल्यामुळे चिखलात जाणे धोक्याचे होते. म्हणून पोलीस कुणालाही जाऊ देत नव्हते. काका व भाऊ तेथे गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले व काही झाले तरी जाऊ देणार नाही म्हणून हुज्जत घालू लागले. काकांनी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आधी उल्लेख केल्याप्रमाणे कळसावर रॅाकेलचा डबा अडवून ठेवला होता व या लोकांकडे लाईटर होता. त्याचा उपयोग करून त्यंनी थंडीवर मात करण्यासाठी अंगावरील वाळलेले कपडे काढून मशाली तयार केल्या होत्या. त्या काकांना इथून दिसत होत्या. त्या त्यांनी पोलिसांना दाखवल्या व तिथे आमची माणसे आहेत त्यांना सोडवण्यासाठी आम्ही जात आहोत असे पोलिसांना सांगितली तरी पोलिसांनी आपला हेका सुरूच ठेवला. खरे तर पोलिसांनी ह्या दोघांबरोबर मदतीला जाणे आवश्यक होते पण शेवटी पोलिसांना न जुमानता हे दोघे चिखलातून वाट काढत जाऊ लागले. एकीकडे बॅटरीचा झोत टाकून आपण येत असल्याचे त्या लोकांना कळवले. त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनीही पलिते हलवून उत्तर दिले.

११ मैलांवरून आलेले पाणी आपल्याबरोबर काय घेऊन आले असेल व त्या चिखलात काय दडले असेल हे दिवसाही समजणे शक्य नव्हते, तर हे दोघे मिट्ट काळोखात केवळ बॅटरीच्या आधाराने वाड्यात पोहोचले. नशीबाने सकाळी वापरलेल्या बांधकामाच्या शिगा त्यांना सापडल्या. व त्यांच्या आधाराने वर चढून तिथे गारठून व भीतीने गोठून गेलेल्या मंडळींना त्यांनी खाली आणले. गारठ्याने व भीतीने काही जणांच्या हाताच्या घड्या इतक्या घट्ट बसल्या होत्या की त्या सोडवाव्या लागल्या. त्यांना असे लक्षात आले की चित्राव शास्त्री व त्यांचे चिरंजीव यांना त्यांचे गडी घेऊन गेले होते पण बाकी लोकांची त्यांनी विचारपूस ही केली नव्हती. असो.

सर्व लोकांना आपापल्या घरी सुखरूप पोहोचवून मग हे दोघे उत्तर रात्री स्टेशनजवळ घरीे पोहोचले. ही केवळ प्रलयाच्या दिवशीची हकीकत आहे. त्यानंतर व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी काकांना किती सायास पडले याविषयी बोलायला लागले तर कादंबरी होईल. नेहमीप्रमाणे सर्व सरकारी खात्यांतील लोकांनी अडवणुकीचे धोरण अवलंबले होते. पण उल्लेख केलाच पाहिजे अशी गोष्ट म्हणजे त्यावेळचे कमिशनर श्री स. गो. बर्वे साहेब यांनी मात्र काकांना वस्तुस्थिती समजल्यावर फारच मदत केली. व्यवसाय सुरू होण्यास सहा महिने लागले. आमच्यासारखीच इतरांची अवस्था होती. त्यामुळे त्यांना त्यांचे लाॅन्ड्रीत टाकलेले कपडे किंवा काॅम्पेंसेशन हवे होते. कपडे चिखलामुळे शिल्लकच राहिले नव्हते पण काकांनी सर्वांचे नुकसान भरून दिले.

शून्यातून निर्माण केलेली सृष्टी त्यांच्या देखताडोळ्या प्रलयाधीन झाली पण संकटात खचून जातील ते नामदेवराव कसले! परिस्थितीपुढे शड्डू ठोकून उभे राहून त्यंनी गेलेले सर्व वैभव खडतर परिश्रमाने पुन्हा मिळवलेच. पण कळस म्हणजे पद्मावती भागात बंगलाही बांधला. स्वत: जिवावरच्या संकटात सापडून प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून बाहेर येऊन, इतरांच्या सुटकेसाठी पुन्हा स्वत: त्या भीषण चिखलात जाऊन त्यांना सोडवून आणणे याला सिंहाचेच काळीज हवे. रा. स्व. संघाचे संस्कार, सावरकरी तत्वज्ञानाचा अंगिकार व मूळचाच धाडसी स्वभाव यामुळे ते हे सर्व करू शकले.

पुण्यांत येऊन त्यांनी खूप माणसे जोडली. ज्या कोकणातून ते इथे नशीब काढायला आले, तेथील कोणीही गरजवंत आला, तर त्याला ते रिक्त हस्ताने परत पाठवत नसत. आमचा व्यवसाय मोठा असल्यामुळे खूप गडी माणसे असत, त्या सर्वांची नड ते भागवत असत. प्रसंगी इतरांच्या जिवाला जीव देण्याचे त्यांची वृत्ती होती. काकांच्या कर्तृत्वाला माझी आई सौ. लीलाबाई हिची उत्तम साथ होती. अशा आई - वडिलांच्या पोटी मी जन्माला आले, याचा मला सार्थ अभिमान आहे.

Message in Public Interest
Laughing ...

About

Human. Professional. Technologist. Musician. Naturophile. Linguaphile. Traveller. Philosopher. Friend. Don't-Worry-Be-Happy-ist.